स्वप्नांना पूर्ण करणारा अर्थसंकल्प, पंतप्रधान मोदी यांनी केले कौतुक

Foto
हा अर्थसंकल्प २०४७ च्या विकसित भारताच्या स्वप्नाच्या उड्डाणासाठी एक मजबूत पाया रचतो. आज भारत ज्या 'सुधारणा एक्सप्रेस'वर प्रवास करत आहे, त्याला हा अर्थसंकल्प नवीन ऊर्जा आणि गती देईल. या अभूतपूर्व सुधारणांमुळे भारताच्या धाडसी आणि प्रतिभावान तरुणांना आकाश खुले होईल. हा अर्थसंकल्प वर्तमानातील स्वप्नांना पूर्ण करणारा आहे. 

पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी अर्थसंकल्पात अनेक मोठी पावले उचलली - मोदी
"पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी अर्थसंकल्पात अनेक मोठी पावले उचलण्यात आली आहेत. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर, देशभरातील जलमार्गांचा विस्तार, हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर, टियर २ आणि टियर ३ शहरांच्या विकासावर विशेष लक्ष केंद्रित करणे आणि शहरांना मजबूत आर्थिक पाया प्रदान करण्यासाठी म्युनिसिपल बॉन्ड्सना प्रोत्साहन देणे, ही सर्व पावले विकसित भारताच्या दिशेनं प्रवासाला आणखी गती देतील," असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

हा अर्थसंकल्प केरळसाठी पूर्णपणे निराशाजनक आहे - केसी वेणुगोपाल
हा अर्थसंकल्प केरळसाठी पूर्णपणे निराशाजनक आहे. गेल्या १० वर्षांपासून केरळसाठी एम्स (AIIMS) उभारण्याबाबत आश्वासने दिली जात आहेत, परंतु या अर्थसंकल्पात त्याचा कोणताही उल्लेख नाही. पर्यटन, विमान वाहतूक आणि आरोग्य यांसारख्या क्षेत्रांमध्ये केरळचं महत्त्वपूर्ण योगदान आहे, तरीही राज्यासाठी कोणतीही ठोस तरतूद करण्यात आलेली नाही. खनिज संसाधनांसाठी एका कॉरिडॉरच्या घोषणेसह केलेल्या घोषणा, इतरांना लक्ष्य करून केलेल्या असल्याचं दिसतं. हा अर्थसंकल्प सामान्य लोकांसाठी नाही; तो मोठ्या कॉर्पोरेट्ससाठी आहे, असं म्हणत काँग्रेसचे नेते केसी वेणुगोपाल यांनी टीका केली. 

अर्थसंकल्पीय भाषण अपारदर्शक - जयराम रमेश
अर्थसंकल्पीय भाषण अपारदर्शक होतं, कारण त्यात प्रमुख कार्यक्रम आणि योजनांसाठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदींची कोणतीही कल्पना दिली नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी दिली.